मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! लवकरच वॉटर टॅक्सी सुरु होणार; नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना सूचना (फोटो सौजन्य-X)
मुंबई : मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवरीव वाढता ताण पाहता ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यासोबतच गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक नितेश राणे यांनी सांगितले की, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाने सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेशात २१ ठिकाणे ओळखली गेली आहेत जिथे जेट्टी बांधल्या जातील. पहिल्या टप्प्यात १५ जेट्टी बांधल्या जातील. मत्स्यव्यवसाय विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात खत जेट्टीचे काम केले जाईल. या वॉटर टॅक्सी प्रकल्पाचा मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होईल.