
मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; बचावकार्य युद्धपातळीवर
अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर गुरुवारी (2 जुलै 2026) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला आहे. अस्लम शेख असे ५५ वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी यासंदर्भात माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करत होते.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दादर, प्रभादेवी, माटुंगा, सायन, अंधेरी, मुंब्रा, नालासोपारा, कळंबोलीसह अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अशा परिस्थितीत साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आता मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने पावसाळ्यातील सुरक्षाव्यवस्थेवर टीका होत आहे.
पावसात पाणी साचल्याने कार्यालयात जाणे अशक्य झाल्यामुळे अस्लम शेख घरी माघारी फिरण्याच्या तयारीत होते. यावेळी अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर असलेल्या सन्मान हॉटेलच्या समोर असलेल्या मॅनहोलजवळ आले असताना, पावसाच्या पाण्यामुळे त्यांना मॅनहोल असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते एका उघड्या जागेत पडले. त्यानंतर ते वाहत जाऊन १० ते १५ फूट अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलजवळ दिसले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मॅनहोलशी संबंधित काम सुरू असल्याने त्याचे झाकण उघडे होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उघडा मॅनहोल दिसून न आल्याने संबंधित व्यक्ती त्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष बचाव पथकाच्या मदतीने मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन तब्बल चार तासानंतर मृत्यू व्यक्तीला बाहेर काढण्यात आले.
मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे, उघड्या मॅनहोलपासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.