
रस्त्यांच्या पृष्ठभागावर रिसरफेसिंग टाकण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात पार पडली आढावा बैठक
मुंबईत एमएसआरडीएकडे पाच आणि एमईपी कडे १९ असे एकूण २४ उड्डाणपुल
मुंबई: मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर (रिसरफेसिंग) टाकण्यात यावा. ही कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या दुरुस्तीच्या कामाचे संनियंत्रण नगरविकास विभागाकडून करण्यात यावे यासाठी तज्ञांचा समावेश असलेला गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची सद्यस्थिती व दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेणारी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, एमएसआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
मुंबईत एमएसआरडीएकडे पाच आणि एमईपी कडे १९ असे एकूण २४ उड्डाणपुल असून ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर या उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सर्व रस्त्यांचे रिसरफेसिंग करावे. ज्याठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे अशा ठिकाणी युद्धपातळीवर रस्त्यावरील ठिगळ काढून रस्ता गुळगुळीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या ४२ उड्डाणपुलांची देखील तातडीने दुरूस्ती हाती घ्यावी, असे सांगतानाच अटलसेतूचे देखील रिसरफेसिंग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका आता घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे. असे असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्याचीच सध्या चर्चा सुरु आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार सोडून जातील, अशा बातम्यांमुळे शिंदे नाराज आहेत. हे तर आता सुरु झालेले आहे. ज्या पद्धतीने त्यांचे आपापसांत मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरु झाले आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कामे थांबवले आहेत. अनेक जण आमदार वगैरे फडणवीस यांना कुठलाही थारा देत नाहीत, अशी माहिती मला मुंबईमध्ये एका खूप मोठ्या माणसाने सांगितली. कुणीही गेले तरी देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करत नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.