
मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. हरेश्वर पाटील यांची बुधवारी पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरेश्वर पाटील यांचे मुंबईच्या राजकारणात एक विशेष स्थान होते. त्यांनी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून (अखंड) प्रभाग क्रमांक १२८ मधून सन १९८५ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर, सन १९९२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १६५ मधून आणि सन १९९७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १५९ महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले होते. हरेश्वर पाटील यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या प्रशासनात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी १६ प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता.
दरम्यान, हरेश्वर पाटील यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर बुधवारी हरेश्वर पाटील यांचे निधन झाले. अंत्ययात्रा संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थान असलेल्या लक्ष्मण टॉवर, लिंक रोड दहिसर (पश्चिम) येथून काढण्यात आली. त्यानंतर दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महापौरपदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कामे
महापौरपदाच्या कार्यकाळात हरेश्वर पाटील यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. त्यात मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज सभागृहात भीषण आग लागल्याने सभागृह आणि सभागृहातील राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र जाळून खाक झाले होते. मात्र, जळालेल्या सभागृहाचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून त्या सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे मुंबईतील डांबरी रस्त्यांनी कात टाकायला सुरुवात केली.
दरड कोसळून झाली होती जीवितहानी
घाटकोपर (प.) चिरगनगर येथे 2002 या वर्षात मोठी दरड कोसळून अपघात झाला होता. दोन-तीन चाळीवर कोसळून मोठी जीवित आणि वित्तीयहानी झाली होती. त्यावेळी महापौर म्हणून हरेश्वर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर बचावकार्य करण्यास प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडले.