
दिशा सालियनला कधी भेटलोही नाही
मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एफआयआरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचं नाव असल्याचा दावा सतिश सालियन यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. यावर आता आदित्य ठाकरेंनी मोठं विधान केले आहे. ‘दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आपला काहीही संबंध नाही. मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही किंवा तिला ओळखतही नव्हतो, असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.
सीबीआयला दिलेल्या जबाबात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्यासह काही बॉलिवूड कलाकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेतली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मोठमोठ्या दूरचित्रवाणीवरील आणि प्रसारमाध्यमांमधील खटले तथ्य बदलू शकत नाहीत. अधिकृत फेरतपासणीला राजकीय हेतूने केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आरोपांपासून मुक्तपणे पुढे जाऊ दिले पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुठलेही तथ्य आणि सत्य नसलेले हे सततचे खोटे कॅम्पेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हटले पोस्टमध्ये?
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!