
पूर कुठं आणि किती येणार हे आता आधीच समजणार; टेक्नॉलॉजीने केली कमाल
मुंबई : राज्यात सलग चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गावांचा संपर्क तुटणे, रस्ते पाण्याखाली जाणे आणि नागरिकांचे स्थलांतर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पूर नेमका कुठे येईल आणि पाणी किती साचू शकते, याचा अचूक अंदाज देणारे आयआयटी मुंबईने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठे वरदान ठरण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यास या आंतरविद्याशाखीय कार्यक्रमंतर्गत हे तयार करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईचे डॉ. कशिश साधवानी आणि प्रा. टी. आय. एल्दो यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही दुहेरी मशीन लर्निंग प्रणाली उपग्रहावरील सेंटिनेल-१ रडार डेटा, जमिनीची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक माहितीचा वापर करून ३० मीटर रिझोल्यूशनवर तब्बल ९३ टक्के अचूकतेने पूरप्रवण क्षेत्रांची ओळख करू शकते.
पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार
विशेष म्हणजे ही प्रणाली केवळ पूराचा इशारा देत नाही, तर त्या ठिकाणी पाणी किती खोलीपर्यंत साचेल, याचाही अंदाज वर्तवते. त्यामुळे बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, रुग्णालये, शाळा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, यासाठी प्रशासनाला वेळेत निर्णय घेणे शक्य होणार आहे. पूराचा अंदाज बांधण्यासाठी केवळ पावसाचे प्रमाण हा निकष पुरेसा नसून, जमिनीवरून वाहणारे पृष्ठभाग वाह हा अधिक निर्णायक घटक आहे.
महत्त्वाचे शस्त्र ठरणार
सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील पूरप्रवण भागांसाठीही ते प्रभावीपणे वापरता येऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
पुराचाच नाहीतर पाण्याचाही मिळणार अंदाज
हे मॉडेल केवळ पूर येईल की नाही, एवढेच सांगत नाही; तर पाणी किती साचेल, याचाही अंदाज देत असल्याने आपत्तीपूर्व नियोजन, संसाधनांचे वाटप आणि बचावकार्यात मोठी मदत होऊ शकते.
– कशिश साधवानी, आयआयटी, मुंबई