Devendra Fadanvis: सागर बंगल्यावर घडामोडींना वेग; भाजप नेत्यांसह मनसेचा 'हा' शिलेदार फडणवीसांच्या भेटीला
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास काहीच कालावधी शिल्लक राहील आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही बाजूने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्यात निकाल जाहीर होण्याआधीच वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची वर्दळ वाढली आहे. बहुमत न मिळाल्यास महायुतीने प्लॅन बी देखील तयार केला असल्याचे समजते आहे.
विधानसभा निकालाआधी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते आहे. भाजपचे अनेक मोठे नेते या बैठकीला हजर असल्याचे समजते आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना एकत्रित करण्यासाठी किंवा पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगांवकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. तर, मनसेचे बाळा नांदगावकर यांन देखील फडणवीसांची भेट घेतली आहे.
काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 37 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला 18 ते 30 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉँग्रेसला 28 ते 47 जागा मिळू शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 तर शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 जागा मिळू शकतात.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने व्यक्त केला आहे.
मनसेची भूमिका ठरणार महत्वाची
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. तसेच मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा किंगमेकर होण्याची शक्यता आहे.