
मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट
प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेतील गजबजलेल्या मार्गावर बेस्ट बस अचानक भरधाव वेगाने पुढे गेली आणि समोर उभ्या असलेल्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक देत गेली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की अनेक रिक्षा एकमेकांवर आदळल्या, तर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी
प्राथमिक माहितीनुसार, बेस्ट बसचे ब्रेक निकामी (ब्रेक फेल) झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास वाहतूक पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून सुरू आहे. तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
या अपघातामुळे अंधेरी पश्चिमेतील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी मोठ्या प्रमाणावर जखमी आणि वाहनांचे नुकसान झाल्याने बेस्ट बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बसची नियमित तांत्रिक तपासणी, ब्रेक प्रणालीची देखभाल आणि सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षाव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी या घटनेनंतर पुन्हा जोर धरू लागली आहे.