
Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप
सध्या एमएमआरडीएच्या नेटवर्कमध्ये मेट्रो मार्गिका २अ (दहिसर पूर्व–अंधेरी पश्चिम), मार्गिका ७ (दहिसर पूर्व–गुंदवली), मार्गिका २ब (टप्पा-१) (डायमंड गार्डन–मंडाळे) आणि मार्गिका ९ (टप्पा-१) (दहिसर पूर्व–काशीगाव) या मार्गिकांचा समावेश आहे.
या यशातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदवले गेले. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून हा सर्वात वेगवान टप्पा ठरला आहे. या काळात सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यात ३.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि हंगामी प्रवास असूनही ही वाढ कायम राहिली आहे.
२ एप्रिल २०२२ : मेट्रो मार्गिका २अ आणि ७ सुरू
१७ सप्टेंबर २०२२ : ५० लाख प्रवासी
२७ जानेवारी २०२३ : १ कोटी प्रवासी
२० सप्टेंबर २०२३ : ५ कोटी प्रवासी
२८ मे २०२४ : १० कोटी प्रवासी
४ जानेवारी २०२५ : १५ कोटी प्रवासी
४ ऑगस्ट २०२५ : २० कोटी प्रवासी
५ फेब्रुवारी २०२६ : २५ कोटी प्रवासी
३ ऑगस्ट २०२६ : ३० कोटी प्रवासी
“३० कोटी प्रवास हा केवळ एक आकडा नाही; तर मुंबईकरांनी आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर व्यक्त केलेला विश्वास आहे.” एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवासी संख्येचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी… pic.twitter.com/DlhkvYUZ9A — MMRDA (@MMRDAOfficial) August 4, 2026
७ एप्रिल २०२६ रोजी मेट्रो मार्गिका २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) सुरू झाल्यानंतर नेटवर्कमध्ये ९ नवीन स्थानकांची भर पडली. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील संपर्कक्षमता अधिक मजबूत झाली असून, प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, “३० कोटी प्रवासी हा केवळ आकडा नसून आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. जागतिक दर्जाचे मेट्रो नेटवर्क उभारून भविष्यातील मुंबई अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्याचा आमचा संकल्प आहे.”
उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “हा टप्पा मुंबईकरांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. भविष्यात ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश अखंड मेट्रो नेटवर्कने जोडण्याचा आमचा निर्धार असून प्रत्येक नागरिकाला अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.”
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, “३० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. दररोज जवळपास २.८ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत असल्याने ती मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. हजारो अभियंते, नियोजक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा टप्पा गाठता आला असून हा ऐतिहासिक विक्रम आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना समर्पित करतो.”
एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कचा सातत्याने होत असलेला विस्तार, वाढती प्रवासीसंख्या आणि आधुनिक सुविधा यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीत मेट्रोचा वाटा दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे.