
Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? (Photo Credit- AI)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत आगामी दिवसांत रिमझिम ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवार, ७ ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी कोणताही ‘अलर्ट’ जारी केलेला नाही. जुलैमध्ये कोसळलेल्या धुवाधार पावसानंतर ऑगस्टमध्ये मान्सून मंदावण्याचे मुख्य कारण म्हणजे बाष्प वाहून आणणाऱ्या आणि मान्सूनच्या प्रवाहाला गती देणाऱ्या तीव्र हवामान प्रणालीचा अभाव असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईतील तापमानात वाढ होणार आहे. आयएमडीच्या मते, दिवसाचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या पार जाऊ शकते, तर संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी ते २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. जरी या आठवड्यात मुसळधार पाऊस हुलकावणी देणार असला, तरी ऑगस्ट महिन्यात मुंबईत सरासरी ५६१ मिमी (सांताक्रूझ) आणि ४७२ मिमी (कुलाबा) पावसाची नोंद होत असते. त्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुलै महिन्यात मुंबईने आपल्या सरासरी पावसाचा कोटा तब्बल ६६ टक्क्यांनी ओलांडला होता. १ ते ३० जुलै दरम्यान सांताक्रूझ वेधशाळेत १,४९१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती, जी ८९८.४ मिमीच्या मासिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या तलावांमध्ये १२.९५ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या ८९.५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.