मेट्रो-६ च्या कारशेडचा तिढा अद्याप कायम! तोडगा न काढताच मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न
स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मेट्रो प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग कारशेडसाठी केंद्र सरकारच्या स्तरावर भूसंपादन रखडल्याने मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतरही ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कांजुरमार्ग कारशेडचा प्रश्न सुटेपर्यंत मेट्रो-६ चे काम थांबवण्याऐवजी ‘एमएमआरडीए’ने पर्यायी मार्ग स्वीकारला असून ही मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.(फोटो सौजन्य – istock)
पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी थेट जोडणाऱ्या यां मार्गिकमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ एप्रिल २०२३ रोजी सुमारे १५ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली. या निर्णयाला केंद्र सरकारच्या मिठागर (सॉल्ट पॅन) विभागाने न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले.
त्यामुळे कारशेडच्या प्रत्यक्ष बांधकामाला मोठा धक्का बसला. आता संबंधित याचिका मागे घेण्यात आली असली, तरी जमिनीच्या वापरबदलाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.हा प्रश्न सुटण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. जून २०२६ मधील अहवालानुसार प्रकल्पाची सुमारे ८८ टक्के प्रगती झाली आहे.सन २०२७ चे लक्ष्य गाठताना कारशेडसह जागेची अडचण दूर काम करणे अत्यावश्यक आहे.
भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, 7 जणांचा मृत्यू
कांजुरमार्ग कारशेडचा प्रश्न सुटेपर्यंत मेट्रो-६ चे थांबवण्याऐवजी एमएमआरडीएने पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. पुणे मेट्रोच्या धर्तीवर कांजुरमार्ग येथे व्हायाडक्टवरच स्टॅब्लिंग लाइन, कोच वॉशिंग प्लान्ट, इन्स्पेक्शन पिट आणि वर्कशॉप यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे कारशेडची जमीन मिळण्यास विलंब झाला, तरी मेट्रो मार्ग-६ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.






