दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा
सावरपाडा येथील सुविधा केंद्रात एकूण 29 टॉयलेट सीट आणि सहा लॉन्ड्री मशीन बसवण्यात आल्या आहेत. यासोबतच पाणी शुद्धीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरमहा 150 रुपयांत अमर्यादित शौचालय वापरता येणार आहे. आरओ-फिल्टर केलेले पिण्याचे पाणी एक रुपया प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल. सात किलो कपडे धुण्यासाठी 70 रुपये आकारण्यात येणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अशा प्रकारचे प्रत्येक सुविधा केंद्र साधारण नऊ महिन्यांत संचालनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होऊ शकते.
सावरपाड्यातील हे केंद्र कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात PPP मॉडेलवर उभारण्यात आले आहे. या उपक्रमात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, HSBC इंडिया, JSW फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी आहेत.
या सुविधा केंद्राच्या बांधकामात शाश्वत डिझाइनवरही भर देण्यात आला आहे. ग्रीन स्टील आणि ग्रीन सिमेंटचा वापर करण्यात आला असून छतावर सौरऊर्जा यंत्रणा आणि ग्रेवॉटर रिसायकलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा विचार करून केंद्राची रचना करण्यात आली आहे. पुरापासून संरक्षणासाठी हे केंद्र जमिनीपासून तीन फूट उंचीवर बांधण्यात आले आहे.
उत्तर मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी, आंघोळ आणि लॉन्ड्रीसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यकता भासल्यास उत्तर मुंबईत अशा प्रकारची 100 सुविधा केंद्रे उभारण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी उत्तर मुंबईत सुरू करण्यात आलेल्या एका सुविधा केंद्राचा दररोज 1,500 पेक्षा अधिक नागरिक वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांकडून त्याचे व्यवस्थापन केले जात असून महिला स्वयं-सहायता गटांची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
नवीन सुविधा केंद्राच्या व्यवस्थापनातही महिलांचा सहभाग वाढवण्यावर गोयल यांनी भर दिला. महिलांनी हे केंद्र चालवावे आणि आपल्या घराप्रमाणे त्याची स्वच्छता व देखभाल करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील पटवाई गावाच्या उदाहरणाचाही गोयल यांनी उल्लेख केला. तेथील युवकांनी एकत्र येऊन परिसर आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याचे सांगत उत्तर मुंबईतील युवकांनीही आपल्या भागात स्वच्छतेसाठी टीम तयार कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. उत्तर मुंबईतील नऊ तलावांच्या स्वच्छतेचे काम सुरू असून, त्यापैकी एका तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील तलावाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावरपाड्यात सुरू झालेले हे केंद्र केवळ सार्वजनिक स्वच्छतागृहापुरते मर्यादित नसून स्वच्छता, पाणी, आंघोळ आणि कपडे धुण्याच्या मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे बहुउद्देशीय जनसुविधा केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे.






