
'एसटी ही गोमाता, अर्थखाते गोचीड’; एसटी कर्मचाऱ्यांचा घंटानाद आंदोलनातून सरकारवर हल्लाबोल
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिक अडचणीतून जात असताना एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी अर्थ खात्यावर जोरदार टीका करत एसटीच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाल्याचा इशारा दिला.
आंदोलनादरम्यान महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचे नेते श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, “एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून खेडोपाड्यातील गरीब जनतेची गोमाता आहे. मात्र अर्थ खाते कराच्या रूपाने या गोमातेचे रक्त शोषण्याचे काम करत आहे,” असा घणाघात केला. त्यांनी अर्थ खात्याची तुलना ‘गोचीड’शी करत, करांचा बोजा कमी झाला नाही तर एसटी व्यवस्था कोलमडून पडेल, असा इशाराही दिला.
एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून त्याचप्रमाणे खेड्या पाड्यातील गरीब माणसाची गोमाता सुद्धा आहे. अर्थ खाते म्हणजे गोमाते वरील गोचीड असून हे खाते कराच्या रूपाने गोमातेचे रक्त शोशण्याचे काम करीत आहे. कररूपी गोचीड बाजूला झाले नाहीतर एसटी कोलमडून पडेल त्यामुळे कामगारांच्या या आंदोलनास सर्वांनी साथ देऊन लोकचळवळ उभी केली पाहिजे असे, आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचे नेते श्रीरंग बरगे यांनी केली आहे. आज (15 जून 2026) एसटी कामगार कृती समितीच्यावतीने मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते,हणमंत ताटे, संदीप शिंदे, अनिल श्रावने,हिरेन रेडकर, मारुती कांबळे, बंडू फड, रमेश शिंदे, शहादेव डोळस,आदी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष,व प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी दिलीप जगताप यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राज्याच्या सर्वांगीण विकासासात सर्वात मोठा वाटा असलेली रक्तवाहिनी आज अडचणीत असून तिचे सेवकसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलेली वेतनवाढ फरकाची ४०८ कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला अर्थ खाते द्यायला तयार नाही किंबहुना ते देणार नाही असे लेखी कळवले आहे.देशात सर्वात जास्त डिझेल खरेदी वरील २१ टक्के वॅट महाराष्ट्रात आहे. या एप्रिल महिन्यात प्रवासी कर ३७ कोटी रुपये इतका असून ,महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे कररूपाने रक्त शोशण्याचे काम सरकार करीत असून अर्थ खाते म्हणजे गोचीड आहे.अर्थमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थ खात्यात बसलेल्या गोचीडाला अभय देत आहेत असा आरोपही बरगे यांनी केला आहे.
आंदोलन नुसता महागाई भत्ता मिळावा म्हणून नसून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सन २९१६ ते २०२० या कालावधीत झालेल्या वेतनवाढीमध्ये वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्क्यावरून कमी करून दोन टक्के करण्यात आला आहे. त्यात कामगारांचे मोठे नुकसान झाले असून सन २०१६ पासून एक टक्के इतका वेतनवाढीचा दर दिला तरच कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होऊ शकते. पण दीर्घकालीन संपा नंतर नेमलेल्या सरकारी समितीने ही मागणी फेटाळली असून हा वेतनवाढीच्या दरात पुन्हा वाढ केली नाहीतर आंदोलन मागे घेतले जाणार नाही असेही बरगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.