
भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी(दि. १५) पासून पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर सुरू होताच पहिल्याच दिवशी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जात असल्याने प्रशासनाने विनानोंदणी भाविकांनी मंदिरात येऊ नये, असे आवाहन केले आहे.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारणी, पायरीमार्ग सुधारणा आणि विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी ९ जानेवारीपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, जवळपास एक वर्ष लागण्याचा अंदाज असलेले सभामंडपाचे काम अवघ्या पाच महिन्यांत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
दररोज केवळ एक हजार भाविकांना प्रवेश
मंदिर प्रशासनाने १५ जून ते ३० जून या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाची व्यवस्था केली आहे. दररोज केवळ एक हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ:https://shreebhimashankar.com येथे ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ५ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नोंदणी केलेल्या भाविकांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सध्या सभामंडपावरील घुमट तसेच पायरीमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर मंदिर सर्व भाविकांसाठी निर्बंधमुक्त खुले करण्यात येणार आहे. तोपर्यंत मंदिर प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा…; शिरुरमध्ये वीज ग्राहक संघटनेचा इशारा
शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेला प्रतिसाद देण्याचे आवाहन
स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि भिमाशंकर संस्थान यांच्या सहकार्यामुळे मुख्य सभामंडपाचे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाची पायाभूत कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामेही जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पाच महिन्यांनंतर भगवान भीमाशंकरांचे दर्शन घेण्याचे भाग्य अनेक भाविकांना लाभले. ऑनलाईन नोंदणीमुळे व्यवस्था शिस्तबद्ध झाली आहे. विकासकामे पाहून समाधान वाटले. मंदिर परिसराचा होत असलेला कायापालट भाविकांसाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे. -विकास बेंगडे, भाविक.