
राज्यात १.८० कोटी मतदारांची नावे वगळणार?
मुंबई : राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदारांचे गणना अर्ज जमा झालेले नाहीत. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत तर स्थिती आणखी गंभीर आहे. मुंबईतील केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटलाईज झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मतदारांनी स्वतःहून वेबसाईटवर तपासणी करावी, राजकीय पक्षांनीदेखील यादी तपासावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. गणना अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट आहे.
बदल करण्याची मुभा
पात्र मतदारांचे नाव प्रारूप यादीत नसल्यास २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत फॉर्म ६ भरून नाव समाविष्ट करता येईल. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत अर्ज करता येणार आहे. काही बदल असेल तर फॉर्म ८ भरता येणार आहे.
मुंबईत केवळ ६३ टक्के माहिती प्राप्त
मुंबई शहर आणि उपनगरात केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटाईज झाली आहे. उर्वरित सुमारे २९ टक्के मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसणार नसल्याची शक्यता आहे. उर्वरित सात टक्के माहितीवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही चोक्कलिंगम यांनी दिली.
पुण्यातील तब्बल ११ लाख मतदारांची नावे गायब होणार
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या सुमारे ११ लाख मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांच्या अनुपस्थितीचे तीन वेळा पंचनामे करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.