
महापालिकेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिका प्रसारित होताच त्यावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे.कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेत आमदार खासदार यांची नावे वगळण्यात आली असून एकप्रकारे हे राजशिष्टाचाराचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकातील कलम 3 आणि 5 चे उघड उल्लंघन या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत झाल्याचे बारोट यांनी निदर्शनास आणून दिले.राजशिष्टाचारानुसार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची नावे पत्रिकेत असणे बंधनकारक असताना, खासदार डॉ. हेमंत सवरा, वसईच्या आमदार स्नेहा दुबे, बोईसरचे आमदार विलास तरे आणि पालकमंत्र्यांची नावेच निमंत्रण पत्रिकेतून गायब आहेत. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार राजन नाईक यांचे नाव माजी पदाधिकारी आणि उपमहापौर यांच्या नावाखाली छापून त्यांचा अवमान केल्याचा दावा भाजपने केला आहे.
प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून हा कार्यक्रम आयोजित केला असून या छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत केवळ बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची नाव असल्याने हा कार्यक्रम महापालिकेचा आहे की एका विशिष्ट राजकीय पक्षाचा असा सवाल भाजपचे मनोज बारोट यांनी केला आहे.याप्रकरणी आयुक्ताचे निलंबन करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आणि बविआ असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
महापालिकेने पत्रिका छापल्या नसल्याचा खुलासा
वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘ए’ बोळींजच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि चंदनसार येथील ट्रॉमा सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन उद्या, 13 मार्च 2026 रोजी आयोजित केल्याबाबतच्या निमंत्रण पत्रिका सध्या सर्वत्र फिरत आहेत. मात्र, या पत्रिका महानगरपालिकेने अधिकृतरित्या छापलेल्या किंवा वाटप केलेल्या नाहीत, असा स्पष्ट खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे.या प्रकरणी महापालिकेकडून चौकशी करण्यात येत असून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल असे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.