Shambhuraj Desai
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि आसपासच्या भागात कोळसा वाहतुकीमुळे वाढणारे प्रदूषण तसेच अपघातांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष उपाययोजना करणार आहे. यासाठी कोळसा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात येणार असून, या संकल्पनेवर आधारित ‘चंद्रपूर मॉडेल’ तयार करण्यात येईल, अशी माहिती उत्पादन शुल्क व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
राजुरा तालुक्यातील कोळसा खाणींमुळे परिसरात वाढणारे प्रदूषण आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ट्रक चालकांविरोधात आमदार उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कोळसा वाहतुकीदरम्यान उघड्यावर कोळसा नेल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, शेतीचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सांगितले की, कोळसा वाहतुकीसाठी लवकरच ठोस कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाणार आहे. ताडपत्री न वापरता कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिस आणि आरटीओकडून कारवाई सुरू आहे.
हे देखील वाचा : दिलासादायक ! युद्धादरम्यानचं तेल संकट आता लवकरच दूर होईल; 32 देशांनी उघडले आपात्कालीन साठे
दरम्यान, आतापर्यंत ५०० हून अधिक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोळसा वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, जीपीएसद्वारे वाहनांचा संपूर्ण प्रवास नोंदवला जाईल. तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अधिवेशनानंतर पर्यावरण, गृह आणि परिवहन विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार खापरेंच्या प्रश्नावर मंत्र्यांची माहिती
याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर मंत्री देसाई यांनी हा निर्णय जाहीर केला.
हेदेखील वाचा : Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार






