
Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर
भाईंदर: जागतिक मँग्रोव्ह (कांदळवन) दिनानिमित्त रविवारी भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क खाडीलगतच्या कांदळवन परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मीरा-भाईंदर शहरातील तरुण-तरुणी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू हटवत कांदळवन संवर्धनाचा संदेश दिला.
विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या दिवशी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग, पर्यावरण विभाग तसेच संबंधित कांदळवन विभागाचा कोणताही प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणांना जागतिक कांदळवन दिनाचाच विसर पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सहभागी तरुणांनी स्वच्छता अभियान राबविताना नागरिकांना कांदळवनांचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. किनारपट्टीचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पूरस्थितीपासून बचाव करण्यासाठी कांदळवने अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी काही समाजसेवकांनी मीरा-भाईंदरमधील कांदळवनांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण कोकण विभागात मीरा-भाईंदर हे असे शहर आहे, जिथे कांदळवनांची बेकायदा कत्तल आणि नासधूस केल्याप्रकरणी २०० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये पुढील तपास आणि कारवाई संथ गतीने होत असल्याने दोषींवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी कांदळवन संरक्षणासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांसोबत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी मागणी समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींनी केली. जागतिक कांदळवन दिनानिमित्त तरुणाईने राबविलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा सकारात्मक संदेश संपूर्ण मीरा-भाईंदर शहराला मिळाला.