
नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल (Photo Credit - X)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “कोणत्याही उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी ही नेतृत्वाच्या आचरणातून सिद्ध व्हायला हवी. जर सुरक्षाविषयक कारणांमुळे मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहने कमी करणे शक्य नसेल, तर सर्वसामान्य जनतेकडून अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगणे अयोग्य आहे.”
आज देश के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी को पत्र लिखकर सरकारी दौरों में कटौती करने तथा चार्टर्ड विमानों और बड़े काफिलों के उपयोग को सीमित करने की मांग की गई है। साथ ही, जनता को पेट्रोल-डीजल की खपत कम करने की दी जा रही सलाह का पालन स्वयं से शुरू करने का आग्रह भी किया गया… pic.twitter.com/Sw115Thz0b — Nana Patole (@NANA_PATOLE) May 11, 2026
पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यावर भाष्य करताना पटोले यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे उदाहरण दिले. “पंतप्रधान हे जनतेसाठी असतात आणि जनतेशी थेट संवाद साधताना भीतीला जागा नसावी. राजीव गांधी नेहमीच जनतेमध्ये मिसळून काम करत असत. जर त्यांना आपल्या सुरक्षेची भीती वाटली असती, तर ते जनतेमध्ये कधीच वावरले नसते,” असेही त्यांनी नमूद केले.
नाना पटोले यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांना नम्र विनंती केली की, “जर देशाला खरोखरच आर्थिक संकटातून वाचवायचे असेल आणि परकीय चलनाची बचत करायची असेल, तर सत्तेत असलेल्यांनी प्रथम स्वतःवर बंधने घालायला हवीत. जेव्हा नेतृत्व स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करते, तेव्हाच जनता त्यांचे अनुकरण करण्यास प्रेरित होते. त्यामुळे हा निर्णय सर्वप्रथम स्वतःला आणि आपल्या मंत्रिमंडळाला लागू करून देशासमोर एक आदर्श वस्तुपाठ सादर करावा.”
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता, इंधनाची बचत करणे ही आता एक राष्ट्रीय गरज बनली आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या पद्धतींचा पुन्हा अवलंब करण्याचे सुचवले. इतकेच नव्हे, तर देशावरील आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना पुढील वर्षभर लग्नसमारंभांसाठी सोने खरेदी करणे टाळण्याचाही सल्ला दिला.