
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून फडणवीस यांच्या भाजपा व आरएसएसने अजेंडा चालवून देशात अराजक माजवण्याचे काम केले होते, अशा प्रवृत्तींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडाच दिसू शकतो, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. तसेच मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही, असाही इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, पण जे लोक संविधानच मानत नाहीत त्यांना आंदोलनाचे महत्व कळणार नाही. शेतकरी आंदोलकांना खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांची बदनामी करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून फडणविसांपर्यंत भाजपची संपूर्ण पिलावळ कार्यरत होती. सरकारला प्रश्न विचारला की त्यांना देशद्रोही ठरवण्याचा अजेंडा भाजपाचा आहे. जनतेला उत्तर देण्याची धमक भाजपा सरकारमध्ये नाही. फडणविसांचा दिल्लीतील आका तर स्वतःला हुकूमशाहच समजतो, त्यामुळे चर्चा, संवाद ही लोकशाही मुल्ये कधीच इतिहास जमा झाली आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना थोडे तारतम्य बाळगावे.
दिल्लीत विद्यार्थ्यांना जनावरासारखी मारहाण करण्यात आली. १४-१५ वर्षांच्या विद्यार्थांनाही मोदी-शाहच्या पोलिसांनी सोडले नाही. मुलींचे कपडे फाडले, त्यांना अश्लील शिवीगाळ केली. या अमानुष लाठी हल्ल्याचे समर्थन देवेंद्र फडणवीस करत आहेत का? अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, हे फडणवीस यांचे दुसरे हास्यास्पद व बेजबाबदार विधान आहे. सरकारला परिस्थिती हाताळता येत नाही, कारण मोदी सरकारला लोकशाही मार्गाने सरकार चालवायचेच नाही. काँग्रेस सरकार असताना आंदोलकांशी चर्चा केली जात होती, मंत्र्यांचे राजीनामेही घेतले जात होते, हे फडणवीस यांना माहित नाही असे नाही. नीट पेपर फुटीचे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वात आधी हाती घेतले व त्यासाठी ‘छात्रों की गुंज’ हे अभियान देशभर सुरु केले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आडून नाही, तर थेट रस्त्यावर उतरून काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारला आहे व यापुढेही विचारत राहू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनावले.
हे सुद्धा वाचा : संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…