
general body meeting nashik
दिनकर पाटील म्हटले तसे प्रशासकीय कार्यकाळात ‘आंधळे दळते कुत्रे पीठ खाते’ अशी परिस्थिती असावी यावर शिक्कामोर्तब होताना दिसतो. देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवणाऱ्या माजी सैनिकांना चक्क रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार देवून त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यानंतर जितक्या तत्परतेने त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय दिला गेला तो देखील अन्याय्यकारकच म्हणावा लागेल. अर्थात ही सुरूवात आहे. यापेक्षा अधिक काय काय झाले असेल ते यथावकाश समोर येईलच पण सुरूवात तर चांगली झाली.सभागृहाचे सार्वभौमत्व, लोकशाही प्रणालीत जनप्रतिनिधींची गरज यातून विषद झाली आणि नाशिककरांना गृहीत धरू नका असा संदेश देण्यात सर्वपक्षीय सदस्य पहिल्याच सभेत यशस्वी झाले आहेत. शहराची संस्कृती, भौगोलिक, सामाजिक परिस्थितीची कोणतीही माहिती, शहरवासियांची जाणीव नसलेल्या अनेक परसेवेतील अधिकाऱ्यांची या काळातील भूमिका फक्त ‘नोकरी’ बजावण्यापुरतील मर्यादित राहिली आहे. पण आता मात्र त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी निश्चित होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात परसेवेतील किती अधिकारी आपल्या बदल्या करून घेतील हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपीकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र ढेरिंगे नामर हा लिपीक नाशिकचाच रहिवाशी निघाला हा योगायोग की आणखी काही ? झिरवाळ यांच्याबाबतीत हा प्रकार घडला म्हणून जिल्ह्यासाठी हे धक्कादायकच म्हणावं लागेल. एरव्ही मंत्रालयात कोणतेच काम पैशांशिवाय होत नाही असं जाहीरपणे म्हटलं जातं. त्यामुळे झिरवाळ यांच्या कार्यालयात ते घडावे या विषयी सामान्यांना काही विशेष वाटणार नाही. परंतु जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या चार मंत्रीपदापैकी एक अगोदरच खालसा झालेले असतांना आता त्यात झिरवाळ यांचा बळी जातो की काय अशी चिंता वाटणे स्वाभाविक आहे. तसेही मंत्री झिरवाळ म्हणतात तसे कोणीतरी त्यांच्या पदावर डोळा ठेवून आहे हे म्हणण्यात काही अंशी तथ्य वाटू लागते. काही महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या नावाने दमदाटी करून ‘सुपारी’ चे दोन ट्रक नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयापुढे कोणी आगंतुकाने लावून पोबारा केला. दोन दिवस बेवारस उभ्या असलेल्या या ट्रकबाबत अन्न व नागरी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवला. त्यानंतर मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आल्यानंतर हे ट्रक ज्या पद्धतीने मध्यरात्री आणले गेले तसेच रात्रीच्या अंधारात गायब करण्यातही आले. मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडावा यावरून झिरवाळ टिकेची धनी झाले. आता पुन्हा हा नवीन प्रकार पाहता राजकीय वैमनस्यातून नव्हे तर त्यांच्याच समर्थकांमधील चढाओढीतून झिरवाळ यांची ‘सुपारी’ वाजविण्याचा तर प्रयत्न नसावा ? असा प्रश्न उपस्थित राहतो.