
शेतकरी चिंतेत! अवकाळी पावसाचा कहर; २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत. प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून अंतिम अहवालानंतर मदत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निफाड, येवला, सिन्नर, बागलाण, दिंडोरी आणि कळवण भागात उभी पिके आडवी पडली. काढणीस तयार असलेला कांदा, गहू आणि मका पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेतातून काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे कुजण्याचा धोका वाढला आहे. द्राक्ष पट्टयात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यावर अस्मानी सुल्तानी संकटांची मालिकाच सुरू आहे. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावनू घेतला आहे. सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आगामी खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने नुकसानग्रास्त पिकांची माहिती तात्काळ नोंदविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले असून त्यामुळे मदत प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे.