
यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी आणि संकष्टी चतुर्थी यांसारखे धार्मिक सण व व्रते येतात. या काळात अनेक महिला महिनाभर उपवास पाळतात, तर काही जणी ठराविक सणांच्या दिवशी उपवास करतात. त्यामुळे बाजारात फराळी पदार्थांना अचानक मोठी मागणी होते. दरवर्षी श्रावणात या पदार्थांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते परंतु, यंदा बाजारात मालाची आवक मर्यादित राहिल्याने व्यापारीवर्गाने भाव वाढवले असून, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.
गेल्या महिन्यात २०० रुपये किलो विकली जाणारी भगर आता २४० रुपयांवर पोहोचली आहे तर ७० रुपये किलोचा साबूदाणा ८५ रुपये किलो, शेंगदाणे १४० ते १६० रुपये किलो, राजगारा पिठाच्या किमतीत मात्र मोठी वाढ झाली असून, १५० रुपये किलोचे राजगिरा पीठ २४० रुपये किलोने विक्री होत आहे. तर फळांमध्ये खजूर २२० ते ३१० रुपये किलो, सफरचंद २०० ते २७० रुपये किलो तर केळी ७० ते ९० रुपये डझनने विक्री होत आहे.
किराणा बाजारात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा पीठ आणि भगूर या उपवासाच्या मुख्य पदार्थांच्या दरात प्रति किलोमागे २० ते ३० रुपयांची दरवाढ झाली आहे. फक्त किराणाच नव्हे, तर फळबाजारही या महागाईतून सुटलेला नाही, सफरचंद, केळी, अलिब व इतर फळांव्या किमती प्रचंड वाढल्याने उपवासाच्या दिवशी फलाहार करणेही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.