मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या १६.८० हेक्टर (सुमारे ४१.५१ एकर) जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज देशाला गरज आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर हा याच संकल्पनेचे मूर्त रूप ठरेल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची संधी उपलब्ध होईल, तसेच संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळेल.
ते म्हणाले की, नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून देशभरात वेगळी ओळख आहे. आता या प्रकल्पामुळे नाशिक शहराची ओळख उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्र म्हणूनही निर्माण होणार आहे. राज्य शासन या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सहकार्य देत असून, विद्यापीठाच्या उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन असून, ७/१२ उतारा हस्तांतरित झाल्यामुळे संबंधित जमिनीचे अभिलेख विद्यापीठाच्या नावे वर्ग झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने नाशिक येथे अत्याधुनिक, बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून, तो केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित परिसरात संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स विषयातील बी.टेक. अभ्यासक्रमासह विविध आधुनिक व पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत माध्यमातील या अभिनव अभ्यासक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष कौतुक केले आहे.
या परिसरात विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विकसित करण्यात येणार असून, भारतीय ज्ञानपरंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे हे केंद्र देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; रिट याचिका फेटाळली






