संवादातून वाद मिटवणे ही न्यायदानाची सकारात्मक बाजू; सातारा लोकअदालतीत न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे प्रतिपादन!
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद शं. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश प्रियदर्शिनी अ. वाघमारे, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप म. गायकवाड यांच्यासह न्यायव्यवस्था व विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश प्रियदर्शिनी वाघमारे यांनी जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती देतानाच लोकअदालतीची संकल्पना, उद्देश आणि त्याचे महत्त्व विशद केले. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी जिल्ह्यातील विधी सेवा विभागाची भूमिका स्पष्ट केली. न्यायव्यवस्था आणि समाजातील गरजू घटक यांच्यातील दुवा म्हणून विधी सेवा प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जिल्ह्यात वर्षातून चार लोकअदालती आयोजित केल्या जातात. प्रत्येक लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांनी सहकार्य करावे. प्रत्येक लोकअदालतीत किमान दोन प्रकरणे तरी सामोपचाराने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन अरविंद वाघमारे यांनी केले. वकील, पक्षकार आणि न्यायालय यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होऊन पक्षकारांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती राजेश पाटील म्हणाले, “पक्षकार न्यायालयात का येतो, याचा विचार केला पाहिजे. वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी न्यायाधीशांनी प्रयत्न केल्यास त्यात काहीही चुकीचे नाही.” देशाची लोकसंख्या मोठी असून त्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या कमी आहे. त्यामुळे उपलब्ध न्यायव्यवस्थेवर प्रकरणांचा मोठा भार आहे. अशा परिस्थितीत सामोपचाराने प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोकअदालतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
“लोकअदालतीत लोकांना आपले म्हणणे मांडता येते. संवाद साधता येतो आणि परस्पर संमतीने वादावर तोडगा काढता येतो,” असे सांगत न्यायमूर्ती पाटील यांनी लोकअदालतीचे महत्त्व अधोरेखित केले.
सातारा जिल्ह्यात लोकअदालतीच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी, “सातारा जिल्ह्यातील लोकअदालतीचे काम अतिशय चांगले आहे,” असे गौरवोद्गार काढले. लोकअदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी न्यायालयीन यंत्रणा, वकील आणि पक्षकार यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय लोकअदालत ही वाद वाढविण्याऐवजी संवादातून तोडगा काढणारी, वेळ व पैसा वाचविणारी आणि पक्षकारांना मानसिक व आर्थिक दिलासा देणारी प्रभावी न्यायव्यवस्था असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.






