नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : यावर्षीचा गणेशोत्सव मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘राज्य महोत्सव’ म्हणून अतिशय उत्साहात साजरा होत असून नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी व सार्वजनिक उत्सव मंडळात श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली असून उद्या दीड दिवसांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने श्रीगणेशमूर्ती विसर्जनाची सुयोग्य व्यवस्था केली असून नैसर्गिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये 143 इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. नागरिकांची श्रीमूर्ती विसर्जनासाठी एके ठिकाणी होणारी गर्दी टाळावी व त्यांना आपल्या घरापासून जवळच विसर्जन करता यावे तसेच जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने कृत्रिम विसर्जन स्थळांची संख्या मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फुटांपर्यंतच्या श्रीमूर्ती कृत्रिम तलावतच विसर्जित करावयाच्या असून त्याबाबत नागरिकांना आवाहन करून त्यांचे विविध माध्यमातून प्रबोधन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम तलावांची संख्याही वाढवण्यात आलेली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाकरिता सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी परवानगी अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला होता. या सुविधेचाही गणेशोत्सव मंडळांना चांगला लाभ झाला. एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या परवानग्या मिळत असल्याने मंडळांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये नवी मुंबई हे ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून यामध्ये जागरुक नवी मुंबईकर नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. हीच जागरुकता कृत्रिम तलावात श्रीगणेश मूर्ती विसर्जन करून दाखवत जलस्त्रोतांच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
याशिवाय तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी 14 मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: 30 टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात श्रीमूर्ती विसर्जन करावे या आवाहनासही मागील अनेक वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने तब्बल 143 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये – बेलापूर विभागात 20, नेरुळ विभागात 26, वाशी विभागात 16. तुर्भे विभागात 21, कोपरखैरणे विभागात 16, घणसोली विभागात 16, ऐरोली विभागात 18 व दिघा विभागात 10 अशाप्रकारे एकूण 143 कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत.
पारंपारिक 22 व कृत्रिम 143 अशा 165 विसर्जन स्थळांवर दीड दिवस कालावधीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. मागील वर्षी दीड दिवस कालावधीच्या विसर्जनामध्ये 10672 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.त्यास अनुसरून श्रीगणेशोत्सव सुनियोजित पध्दतीने संपन्न व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी तसेच संबंधित पोलीस विभाग, एमएससीडीसीएल अशा प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून सुयोग्य कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यापूर्वीच घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये दिलेले आहेत व त्यानुसार सर्व यंत्रणा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता सज्ज आहे.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार व डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ एक उपायुक्त श्री सोमनाथ पोटरे व परिमंडळ दोन उपायुक्त श्री संजय शिंदे तसेच संबंधित विभागप्रमुख व विभाग अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडावा यासाठी दक्ष आहेत.
• नैसर्गिक व कृत्रिम अशा सर्व 165 विसर्जन स्थानांवर पुरेशा संख्येने स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
• सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आलेली आहे.
• सर्व ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था, जनरेटर व्यवस्था करण्यात आली आहे.
• 22 विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात असणार आहेत.
• 22 विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था कृतीशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत असणार आहेत.
• मुख्य विसर्जन स्थळांवर उपस्थित भाविकांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी व्यासपीठ व्यवस्था करण्यात आलेली आहे.
• सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आयुक्त महोदय यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढही करण्यात आलेली आहे.
• विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यासोबतच प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत तसेच निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची विल्हेवाट लाण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आलेली आहेत.
• पोलीस यंत्रणाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दक्षतेने सज्ज आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनाची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिम तलावांचा वापर करून जलाशयांच्या शुध्दतेमध्ये आपले योगदान द्यावे व इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ . कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.