
नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा
नवीन आदेशानुसार, तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांची बदली एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांची नियुक्ती सेंट्रल क्राईम ब्रांचमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय सुनील शिंदे यांची बदली तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी
एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अजय शिंदे यांनी अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल, गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून नागरिकांमध्येही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक भावना होती.
तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आबासाहेब पाटील यांनीही प्रभावी कामगिरी बजावली. औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, गुन्हेगारी नियंत्रण आणि स्थानिक पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासह जनतेशी संवाद वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
नव्या पोलीस ठाण्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हे अधिकारी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून कोणत्या प्रकारे काम करतात, गुन्हेगारी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना राबवतात आणि नागरिकांशी समन्वय कसा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः एपीएमसी आणि तुर्भे एमआयडीसीसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे एक सक्षम, अभ्यासू आणि परिणामकारक अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता ते शांतपणे आणि प्रभावीपणे प्रशासन चालवत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे आणि जनतेचा विश्वास संपादन करणे यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.
विशेष म्हणजे, पोलीस दलातील महत्त्वाच्या आणि तथाकथित “क्रीम पोस्टिंग” मानल्या जाणाऱ्या ठिकाणांवर नियुक्त्या करताना त्यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता गुणवत्ताधारित निर्णय घेतल्याचे बोलले जाते. गेल्या चार वर्षांत अनेक सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना संधी देत त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
घणसोली उद्यानात पाण्याच्या टाकीची दुरावस्था, दूषित पाण्याची नगरसेवक सौरभ शिंदे यांनी केली पोलखोल
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या या बदल्यांमुळे नवी मुंबई पोलीस दलात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. अनुभवी अधिकाऱ्यांच्या या नियुक्त्यांमुळे संबंधित पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची पुढील कामगिरी कशी राहते आणि नागरिकांच्या अपेक्षांवर ते कितपत खरे उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.