
सातत्याने कामांना मुदतवाढ का? कंत्राटदारांच्या मुदतवाढीवरून सुतारांचा संताप, स्थायी समितीत उपस्थित केला सवाल
आतापर्यंत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकांमध्ये या मुदतवाढीच्या प्रस्तावांवर सातत्याने स्थायी समिती सदस्यांकडून ताशेरे ओढले जात आहेत. माजी महापौर तसेच विद्यमान स्थायी समिती सदस्य जे. डी सुतार यांनी या मुदतवाढीच्या प्रस्तावांवर आक्षेप घेत, अधिकारी मुदतवाढ देईपर्यंत काय करत असतात? अधिकाऱ्यांना उशिरा जाग येते का असा संतप्त सवाल सदस्य जयवंत सुतार यांनी बैठकीत केला.
नवी मुंबई पालिकेत प्रशासकीय कालावधी संपल्यावर महासभा अस्तित्वात येऊन, स्थायी समितीचे कामकाज सुरू झाले आहे. शहरातील नागरी समस्या दूर करण्यासाठी विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर येत आहेत. मात्र अनेक प्रस्ताव मुदतवाढीचे येत आहेत. या मुदतवाढीवर सर्वच स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतले आहेत. तर भाजपाचे सदस्य जयवंत सुतार हे सातत्याने अधिकाऱ्यांना असे प्रस्ताव न आणता नव्याने टेंडर काढलेले प्रस्ताव आणावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत देखील वाशी विभागातील पालिका वास्तूंच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आला होता. यावर सदय जयवंत सुतार व सरोज पाटील यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
वारंवार अनेक कामांना मुदतवाढ का दिली जाते. एखाद्या कंत्राटाचा कालावधी संपणार असल्याचे अधिकाऱ्यांना कळत नाही का ? त्याची पूर्वतयारी का केली जात नाही? तोपर्यंत अधिकारी काय करत असतात? अधिकाऱ्यांनी यापुढे एखाद्या कामाचा कालावधी संपणार असल्यास त्याच्या सहा महिने आधी आपल्या दालनात बोर्डावर लिहून ठेवावे. त्यानुसार त्या कामाचे टेंडर प्रक्रिया सुरू करावी. तसेच आता आणलेल्या वाशी क्षेत्रातील शाळा, रुग्णालय, अन्य इमारती कोणत्या याची माहिती देणे गरजेचे आहे मोघम प्रस्ताव न आणता परिपूर्ण प्रस्ताव आणावेत, अशी माहिती स्थायी समिती सदस्य, भाजपा, माजी महापौर जयवंत सुतार यांनी दिली.
पालिकेने वारंवार मुदतवाढ न देता, नव्याने प्रस्ताव आणावेत. त्याची आधीच तयारी करावी. यातून अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून येतो. अनेक प्रस्ताव परिपूर्ण नसतात. परिपूर्ण प्रस्ताव आणल्यावर सदस्यांना देखील वारंवार प्रश्न विचारावे लागणार नाहीत, अशी माहिती शिवसेना,स्थायी समिती सदस्या सरोज पाटील यांनी दिली.