
युद्धाच्या काळात कांद्याला फटका; दर आणखी घसरण्याची शक्यता
लासलगाव : शेतकरी कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटांनी घेरला जातो. चालू वर्षी देखील कांद्याचे दर सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता भारतातील गॅस सिलेंडरवर युद्धामुळे परिणाम झाल्याने अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कांदा दरात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
कांद्याचे दर घसरलेले असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यंदा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत असल्याने साधारणपणे १ हजार रुपये सरासरी इतका कमी भाव मिळत असल्याने अनेक संघटना तसेच शेतकऱ्यांनी कांदा दर मिळण्यासाठी आंदोलन करून राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
युद्धजन्य स्थितीमुळे आखाती देश असलेले दुबई, सौदे अरेबिया, अबुधाबी, ओमान, कतार, बेहरीन, कुवेत या देशांमधून पूर्णतः कांद्याची मागणी घटलेली असल्याने कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. यामधून शेतकरी अजूनही सावरलेला नसताना आता हॉटेलमधून मागणी घटल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
हॉटेलकडून घटली कांद्याची मागणी
कांद्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम दिसून येतो. मुंबई येथे मोठ्या संख्येने हॉटेल आहेत. याच हॉटेलसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून कांदा स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागणी केला जातो. मात्र, सिलेंडर अभावी हॉटेल बंद करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लासलगाव येथील कांदा निर्यातदार यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास कांद्याची मागणी घटल्यामुळे कांदा दर आणखी घसरून शेतकरी वर्गाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहेत.
गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा
युद्ध परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. पर्यायाने अनेक हॉटेल बंद पडत असल्याची परिस्थिती भारतामध्ये अनेक शहरात निर्माण झाली आहे. हॉटेलमध्ये अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याचा वापर केला जातो. आता हॉटेलच बंद राहणार असल्याने कांद्याच्या मागणीत घसरण झाली आहे.
हेदेखील वाचा : Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार