
पालघरमध्ये भीषण अपघात! (Photo Credit- X)
हा भीषण अपघात पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाणीवरी परिसरात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील एका गावातून साखरपुड्याचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या या टेम्पोमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त नागरिक स्वार होते. धाणीवरी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरने या वऱ्हाडाच्या टेम्पोला जोरदार धडक दिली आणि कंटेनर टेम्पोवरच उलटला. या भयानक प्रसंगानंतर महामार्गावर एकच चीख-पुकार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी, महामार्ग पोलिसांनी आणि मदत पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या कासा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि रुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
या भीषण अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो आणि कंटेनर रस्त्याबाहेर काढले, त्यानंतर हायवेवरील वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात आली.
आनंदाच्या क्षणांमध्ये अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे डहाणूतील संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साखरपुड्याच्या उत्साहाचे रूपांतर क्षणात मातममध्ये झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.