
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
निर्मळ येथील समाज सेवा मंडळ येथे झालेल्या मेळाव्याला वाघोली ते निर्मळ दरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या सुमारे तीन हजार नागरिकांच्या मोर्चाच्या यशाची पार्श्वभूमी लाभली. या आंदोलनामुळे पर्यावरण संवर्धनाच्या लढ्यासाठी संघटनेचा आत्मविश्वास वाढल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनुरिद्ध पॉल यांनी वसईतील पर्यावरणीय बदलांवर मार्गदर्शन केले, तर प्रणाली राऊत यांनी शहरातील पूरसदृश परिस्थितीमागील कारणांचा वेध घेतला. प्रा. भूषण यांनी वाढवण बंदराचा वसई परिसरावर होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत माहिती दिली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य समिती सभापती बिना मायकल फुट्याडों, मीना रॉड्रिग्ज, सरल डाबरे, अॅड. दीप्ती भोईर आणि ज्योत्स्ना डाबरे यांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
रेव्ह. फा. ज्यो आल्मेडा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मावळत्या अध्यक्षा रेजिना क्रास्टो यांनी मनोगत व्यक्त केले, तर नवनिर्वाचित अध्यक्षा नलिनी दोडती यांनी आगामी उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. मेळाव्यास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप फिगेर उपस्थित होते. सूत्रसंचालन मेबल दोडती आणि ज्योत्स्ना डाबरे यांनी केले. तर आभार शालिनी निग्रेल यांनी मानले.
संघटनेचे रुपेश रॉड्रिग्ज यांनी पर्यावरण संवर्धनाबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांची घरे नियमित व अधिकृत करण्यासाठी शासन व महापालिकेशी संवाद साधला जाईल, असे सांगितले. हिरव्या पट्ट्यात प्रीमियम व अॅसिलरीच्या नावाखाली वाढीव एफएसआय देणे म्हणजे वसईला नैसर्गिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या संपविण्यासारखे असल्याचा आरोपही त्यानी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आल्बर्ट डाबरे यांनी हरित पट्टयात मूळ ०.३३ एफएसआय असताना शुल्क भरून १.८० एफएसआयपर्यंत परवानगी दिली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे गावांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहून पारंपरिक गावपण नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. उपाध्यक्षा नीता डाबरे यांनी पर्यावरणासह विविध स्थानिक प्रश्नांवर सातत्याने लढा उभारण्याचे आवाहन केले.