(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६० वर्षांवरील एकाकी व निराधार ज्येष्ठ महिलांना दरमहा तीन हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. मात्र, महागाईसोबतच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वाढलेल्या दरामुळे या रकमेतून दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
दरम्यान, ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर अजीव पाटील यांनी एकाकी निराधार महिलांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत १०० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ मध्ये अशा महिलांना थेट १०० टक्के करसवलत देण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून अनुदानवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.
आजच्या महासभेत दाखल होणाऱ्या प्रस्तावानुसार, पात्र महिलांच्या अनुदानात मालमत्ता करासाठी २०० रुपये आणि पाणीपट्टीसाठी २४० रुपये, अशी एकूण ४४० रुपयांची मासिक वाढ केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित पात्र महिलांना दरमहा ३ हजार ४४० रुपये मिळतील, ज्या महिलांच्या नावे मालमत्ता असून स्वतंत्र नळजोडणी नाही, त्यांना केवळ मालमत्ता करासाठी २०० रुपयांची वाढीव मदत देण्यात येणार आहे. महापालिकेच्या २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पात एकाकी ज्येष्ठ महिलांच्या उपजीविकेसाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून प्रस्तावित अनुदानवाढीचा खर्च भागविण्यात येणार आहे. आता महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळते का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
लाभार्थी महिला ६० वर्षांवरील एकाकी व निराधार असणे आवश्यक आहे. मालमत्ता तिच्या स्वतःच्या नावावर आणि नळजोडणी असलेली असावी. स्वतंत्र मालमत्तेचा वापर केवळ स्वतःच्या निवासासाठी असावा. ती भाड्याने किंवा व्यावसायिक कारणासाठी वापरलेली नसावी. तसेच मालमत्तेचे क्षेत्रफळ एक हजार चौरस फुटांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.






