सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार
शिवाजी हळणवर/पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांनी नुकतीच स्वीकारली. पदभार स्वीकारताच औपचारिक सत्काराला वेळ न देता मंदिर समितीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली असून, भाविकाभिमुख, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासनाला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीतून स्पष्ट झाली आहे.
शासनाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारीपदावर मंत्रालयीन अधिकारी श्रीकांत यादव यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. यादव यांनी मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम केले असून, ते मूळचे वैराग, ता. बार्शी येथील रहिवासी आहेत. यापूर्वी कार्यकारी अधिकारीपदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांचा तीन वर्षांचा प्रतिनियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यभार संपुष्टात आला. त्यानंतर शासनाने यादव यांची या पदावर नियुक्ती केली.
मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि लेखाधिकारी ही तीन पदे शासन स्तरावरील आहेत. यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे स्वागत करण्यासाठी भेटी दिल्या जात आहेत. अनेकांकडून हार, पुष्पगुच्छ आणि सत्काराचे साहित्य आणले जात आहे.
मात्र, ‘सत्कारापेक्षा सेवा महत्त्वाची’ अशी भूमिका घेत यादव यांनी स्वागतासाठी हार-तुरे व पुष्पगुच्छ आणण्याऐवजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रासाठी अथवा गोशाळेसाठी देणगी स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. हार-तुरे आणि पुष्पगुच्छांवर होणारा खर्च अन्नछत्र किंवा गोशाळेसाठी दिल्यास त्याचा थेट लाभ भाविक, वारकरी आणि गोमातांच्या सेवेसाठी होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पदभार स्वीकारल्यानंतर यादव यांनी औपचारिक स्वागत-सत्काराला अधिक वेळ न देता मंदिर समितीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला प्राधान्य दिले आहे. मंदिर समितीच्या विविध विभागांचा त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली असून, संबंधित विभागांचे कामकाज, प्रलंबित विषय, उपलब्ध सुविधा आणि प्रशासनासमोरील विविध बाबींची माहिती घेतली जात आहे.
Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर समितीचे प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक करणे आणि कामकाजात शिस्त आणणे, याला प्राधान्य देण्याचा निर्धार यादव यांच्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीतून दिसून येत आहे. हारांच्या सत्कारापेक्षा सेवेला महत्त्व देत पदभार स्वीकारणाऱ्या यादव यांच्या या भूमिकेची मंदिर परिसरात चर्चा सुरू झाली आहे.






