
संभाजीनगर : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतर्गत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वत्र निकालाची उत्सुकता आहे. प्रशासन देखील मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. एमआयटी येथे 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया (Counting of Votes) पार पडणार आहे. यासाठी तीन हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता निकालाच्या तयारीला वेग आला आहे. येथील एमआयटी कॉलेजच्या इमारतीत स्ट्राँग रूममध्ये सर्व ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. 4 जून रोजी मतमोजणीवेळी त्या उघडल्या जातील. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी अंदाजे तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
3 हजार अतिरिक्त कर्मचारी
निवडणूक कामासाठी प्रशासनाने 20 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी यातील 17 हजार कर्मचारी तैनात होते. यातील तीन हजार कर्मचारी राखीव होते. त्या राखीव कर्मचाऱ्यांना आता मतमोजणी प्रक्रियेसाठी जबाबदारी दिली जाणार आहे. एमआयटी येथे या कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.