
राज्यात २०-२२ एप्रिल दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र २२ तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
कडाक्याच्या उन्हाचा चटका सोसणाऱ्या राज्यातील जनतेसाठी हवामान खात्याने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथा आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. १९ एप्रिलला दुपारनंतर घाट क्षेत्र आणि उत्तर खानदेशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते.