
टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर
पिंपरी शहाले (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या दर्शनासाठी निघाले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस (क्रमांक: एम एच १४ एल एक्स ६७४७) खामुंडी गावाजवळ पोहोचली असताना अचानक बसचा पुढचा टायर फुटला आणि मोठा आवाज झाला. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.
या घटनेमुळे बसमधील मुलांमध्ये एकच रडारड आणि खळबळ उडाली. अपघात होताच खामुंडी गावातील ग्रामस्थ आणि महामार्गावरून जाणारे इतर वाहनचालक मदतीला धावून आले. बसमध्ये अडकलेल्या लहान चिमुकल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता, मात्र ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने जखमींना तातडीने आधार मिळाला.
जखमींची प्रकृती स्थिर
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, १३ मुले आणि ५ शिक्षक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ती पोलिसांनी सुरळीत केली.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
अपघाताच्या बातमीने पिंपरी शहाले परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. सहलीच्या आनंदावर विरजण पडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “शालेय सहलींसाठी वापरल्या जाणाऱ्या खासगी बसेसची तांत्रिक तपासणी केली जाते का? फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही अशा गाड्या रस्त्यावर कशा धावतात?” असा संतप्त सवाल आता पालकांमधून विचारला जात आहे. दरम्यान ओतूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अपघाताची नोंद करण्यात आली आहे. “बसचा टायर नेमका कशामुळे फुटला आणि बसची तांत्रिक स्थिती काय होती, याची सखोल तपासणी आरटीओ मार्फत केली जाईल,” अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.