
चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; नगरपरिषदेने केली आता 'ही' मोठी कारवाई
चाकण/अतिश मेटे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे–नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने महिलेवर हल्ला चढवून तिचा जागीच जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शोभा विजय वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून, त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या. सोमवारी (दि. १६) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला.
प्रतिकाराचा प्रयत्न निष्फळ
दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांनी दगड उचलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अंगाचे लचके तोडले
कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि मानेवर गंभीर चावे घेतले. कपडे फाडून अंगाचे अक्षरशः लचके तोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जवळपास १५ मिनिटे हा भीषण प्रकार सुरू होता. अतिरक्तस्त्राव आणि तीव्र जखमांमुळे शोभा वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सकाळी मृतदेह आढळला
मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अत्याचार किंवा खुनाचा प्रकार असावा अशी चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चाकण शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. काही नागरिकांनी ही कुत्री सामान्य नसून, लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरित प्रजातीची असावीत, असा संशयही व्यक्त केला आहे. या घटनेनंतर नागरिक, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे सुद्धा वाचा : निलंग्यात कर्जवसुलीसाठी दोघांचे अपहरण; गाडीत बसवून शेतात नेले अन्…
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक घटना घडल्या आहेत. मागील महिन्यात मार्केटयार्ड परिसरात एका भटक्या कुत्र्याने तब्बल पंचवीस ते तीस जणांना चावे घेतले होते. परंतु आजच्याभीषण घटनेनंतर चाकण परिसरातील भटक्या कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण मिळवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.