संग्रहित फोटो
निलंगा : कर्जवसुलीच्या नावाखाली कायद्याला धाब्यावर बसवत थेट अपहरण व मारहाणीचा मार्ग अवलंबल्याची संतापजनक घटना निलंगा तालुक्यात उघडकीस आली आहे. दोन जणांना जबरदस्तीने गाडीत बसवून शेतातील शेडमध्ये तब्बल तीन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात निलंगा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
निलंगा तालुक्यातील नणंद येथील गोपाळ नारायणपूरे यांच्या फिर्यादीवरून दत्ता मोहळकर, राणा आर्य, नवनाथ मोहळकर, आदित्य कमले आणि उद्धव शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नणंद येथील पुंडलिक व्यंकटराव भोसले यांनी भाग्यवंती फायनान्सकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने त्या कर्जाचे साक्षीदार असलेल्या चक्रधर मधुकर नारायणपूरे यांच्यावर फायनान्सकडून सतत वसुलीचा दबाव टाकला जात होता. या प्रकरणात अडकू नये म्हणून गोपाळ नारायणपूरे यांनी निलंगा येथील काही व्यक्तीकडून तब्बल २१ लाख रुपये कर्ज घेऊन भाग्यवंती फायनान्सचे पैसे भरले. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही नियमित भरले. मात्र तरीही आरोपींची दादागिरी थांबली नाही.
दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी आरोपी थेट नणंद गावात दाखल झाले. त्यांनी गोपाळ नारायणपूरे व साक्षीदार आण्णाराव कोरके यांना धमकावत जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर दोघांना निलंगा येथील उदगीर मोड परिसरातील एका शेतातील शेडमध्ये नेऊन तब्बल तीन दिवस कैद करून ठेवले. या काळात आरोपींनी दोघांनाही निघृण मारहाण करत पैशांसाठी दबाव टाकला तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे.
अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात दत्ता मोहळकर, राणा आर्य, नवनाथ मोहळकर, आदित्य कमले व उद्धव शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे पुढील तपास करीत आहेत. कर्जवसुलीच्या नावाखाली अपहरण, कैद आणि मारहाणीचे प्रकार वाढत असल्याने निलंगा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा सावकारी प्रवृत्तीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.






