
अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार; 'राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव' - मुख्यमंत्री फडणवीस
पुणे, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तथा पुरस्काराचे मानकरी अजित डोवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोवाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे. 2014 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे परिमाण दिले. त्यांच्या ‘प्रोॲक्टिव्ह डिटरन्स’ च्या संकल्पनेमुळे भारताची सुरक्षा रणनीती अधिक प्रभावी झाली आहे. भारत आता केवळ हल्ले सहन करणारा देश नसून आवश्यकतेनुसार ठोस प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेले सामर्थ्यवान राष्ट्र बनल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळकांनी 1857 नंतर भारतीय समाजात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना चेतवून राष्ट्रवादाला नवी दिशा दिली, ते भारतीय राष्ट्रवादाचे जनक होते. टिळकांनी इंग्रजी साम्राज्याच्या काळात भारतीयांची मानसिकता बदलत त्यांच्या मनात देशभक्तीच्या भावनेचे रोपण केले. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणत राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रहितासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तीलाच लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे उचित असून अजित डोवाल हे त्या परंपरेला साजेसे व्यक्तिमत्त्व असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Sanjay Raut News: २०२९ च्या आधीच राजकीय बाजार उठलेला असेल; भाजपच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांचा पलटवार