
मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प
मंचर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर गेल्या साडेतीन महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असल्यामुळे, या परिसरातील स्थानिक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने प्रशासनाकडून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर हे मंदिर आगामी ३१ मे रोजी सुरू होणार असले, तरी गेल्या साडेतीन महिन्यांत झालेल्या आर्थिक नुकसानीच्या झळा व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.
विकासकामांच्या काळात भीमाशंकर मंदिरातील भाविकांची आणि पर्यटकांची वर्दळ पूर्णपणे थांबली आहे. याचा थेट आणि मोठा परिणाम परिसरातील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मंदिरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, लॉज चालक, पूजासाहित्याची दुकाने, स्थानिक वाहनसेवा, वाहतूकदार तसेच छोटे फेरीवाले यांचे उत्पन्न पूर्णतः ठप्प झाले आहे.
हे सुद्धा वाचा : नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?
वर्दळ थांबल्याने अर्थचक्र कोलमडले
अनेक व्यावसायिकांनी आपले दुकान किंवा व्यवसाय थाटण्यासाठी बँकेकडून अथवा खासगी सावकारांकडून कर्जे घेतली आहेत. मात्र, गेले साडेतीन महिने एक रुपयाचीही कमाई न झाल्याने या कर्जाचे हप्ते (ईएमआय) फेडणे आता अत्यंत कठीण झाले आहे. कर्जबाजारीपणा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना दैनंदिन कौटुंबिक खर्च भागवणेही अवघड बनले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही मोठ्या हॉटेल्स आणि लॉज चालकांना आर्थिक टंचाईमुळे आपल्याकडील कामगारांना कामावरून कमी करावे लागले आहे. परिणामी, भीमाशंकर परिसरात बेरोजगारीतही वाढ झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. आता आगामी ३१ मेपासून मंदिर पुन्हा सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होणार असल्याने, भीमाशंकर परिसरातील धार्मिक पर्यटन पूर्ववत सुरू होईल आणि विस्कळीत झालेले अर्थचक्र पुन्हा रुळावर येईल, अशी आशा स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
“मंदिर सलग साडेतीन महिने बंद राहिल्यामुळे भीमाशंकर परिसरातील अनेक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. आम्ही हॉटेल चालकांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते कसे भरायचे, हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. सध्या कुटुंबाचा रोजचा खर्च चालवण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागत आहे. आता ३१ मे रोजी मंदिर सुरू झाल्यावर भाविकांची गर्दी वाढेल आणि आमची परिस्थिती सुधारेल, अशी एकच आशा आहे.” – संतोष धुमाळ (हॉटेल चालक, रानवारा पेठ, भीमाशंकर)