
एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास...; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक गॅसच्या मागणीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कोथरुड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे शहरात पीएनजी पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला पाटील यांनी एमएनजीएलच्या शहरातील पुरवठा, तांत्रिक अडचणी याबबतचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, मागणी आणि पुरवठ्याबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक मागणी वाढल्याने नागरिकांशी समन्वय साधून भागांत पाईप लाईन पोहोचवण्याचे काम जलदगतीने पुरवावे. तसेच, कामाला गती देण्यासाठी जर मनुष्यबळाची कमतरता भासत असेल, तर लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्रात गॅस टंचाईचा भडका
सध्या जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या वाढत्या तणावाचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दिसू लागले आहेत. मुंबई, नागपूर, अमरावती आणि जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील मालाडमधील मालवणी हा अत्यंत दाट वस्तीचा परिसर सध्या गॅस टंचाईचा केंद्रबिंदू ठरला आहे. गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगेत आपले सिलिंडर चोरीला जाऊ नयेत किंवा कुणी रांगेतील क्रम बदलू नये, यासाठी नागरिकांनी साखळदंडाने ४-५ सिलिंडर एकत्र बांधून त्यांना कुलूप लावले आहे. अनेक नागरिक रात्री १० वाजेपासूनच रस्त्यावर रांगा लावून बसत आहेत. यात महिलांची संख्या मोठी असून, घरकाम आणि मजुरी सोडून त्यांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे.