
'छत्रपती'च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल...
या हंगामात दररोज ८,००० मे. टनांहून अधिक ऊस गाळप सातत्याने करण्यात आले. प्लँटमध्ये कुठेही जॅमिंग न होता कमीत कमी स्टॉपेजेस झाले आणि संपूर्ण हंगामात केवळ एकदाच क्लिनिंग घेण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
सहवीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत ३,९२,५१,३०० युनिट्स वीज निर्मिती झाली असून अंतर्गत वापर वजा जाता २,५७,६६,००० युनिट्स वीज निर्यात करण्यात आली आहे. उत्पादन क्षमतेसोबत ऊर्जा निर्मितीतही कारखान्याने भरीव कामगिरी केली आहे.
याप्रसंगी संचालक शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, चीफ केमिस्ट अमर जगताप व चीफ इंजिनिअर निखिल रणवरे आदी उपस्थित होते.
थकबाकी कपात न करण्याचा निर्णय
हा हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर यांचे संचालक मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यंदा १० लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी ऊस तोडणीचे नियोजन वेळेत करण्यात आले. सभासदांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी ऊस बिलातून कारखान्याकडे असलेली थकबाकी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेअर्सच्या थकबाकीस मुदतवाढ देण्यात आली. सुरु व पूर्वहंगामी उसाला प्रतिटन ७५ रुपये, खोडव्याला प्रतिटन १०० रुपये आणि १६ जानेवारी २०२६ नंतर गाळप झालेल्या उसाला सरसकट प्रतिटन १०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे सरासरी ऊस उत्पादनात घट
दरम्यान, परिसरातील इतर कारखान्यांना उसाची टंचाई असल्याने कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या; मात्र काही सभासदांनी ऊस इतर कारखान्यांकडे वळवला. अतिवृष्टीमुळे सरासरी ऊस उत्पादनात घट झाली. सध्या कारखाना आर्थिक आव्हानांचा सामना करीत असून ऊस गाळप व साखर उतारा वाढल्यासच आर्थिक अडचणींवर मात करता येईल, असे अध्यक्ष जाचक यांनी स्पष्ट केले.