
काँग्रेसकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी! (Photo credit- X)
‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना काँग्रेसने म्हटले आहे की, पुण्यात विषारी दारूमुळे १८ नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. हा ‘महायुती’ सरकारच्या बेजबाबदार कारभाराचा थेट परिणाम असून हे कृत्य म्हणजे “प्रशासकीय हत्या” करण्यापेक्षा कमी काही नाही. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट संगनमताशिवाय, अशा प्रकारचे विषारी दारूची इतक्या उघडपणे विक्री होणे अशक्य आहे. केवळ खंडणी वसुलीचे रॅकेट्स आणि प्रशासकीय शैथिल्यामुळेच आज १८ कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
पुण्यातील विषारी दारूमुळे आतापर्यंत १८ नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत संतापजनक घटना असून, हा महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराने केलेला थेट प्रशासकीय खून आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क (Excise) विभागाच्या भ्रष्ट आशीर्वादाशिवाय राजरोसपणे अशी विषारी दारू विकली जाणे अशक्य आहे.… — Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 29, 2026
देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका करताना काँग्रेसने ठामपणे सांगितले की, या भीषण दुर्घटनेची थेट आणि नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांवरच आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकीय डावपेच आखण्यात आणि आपली खुर्ची टिकवून ठेवण्यातच मग्न आहेत; परिणामी, गृहविभागावरील त्यांची पकड पूर्णपणे ढिली झाली आहे. ज्या व्यक्तीने एकेकाळी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याबाबत पोकळ दावे केले होते, त्याच व्यक्तीचा प्रशासनावर आता ना कोणताही वचक राहिला आहे, ना दरारा. काँग्रेसने अशी भूमिका मांडली की, या निष्पाप लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण, जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.