
प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग महत्वाचा; पुण्यात स्वच्छता मोहिमेला सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती
सुनयना सोनवणे/ पुणे : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेली मुळा-मुठा नदी प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत पोहोचली असून, भावी पिढीला स्वच्छ पाणी, शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त शहर द्यायचे असेल, तर नदी व पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित मोहिमेअंतर्गत भिडे पुलाजवळ मुठा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव श्रीनिवास बी.व्ही., नगरसेविका अल्पना वरपे, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुणाल राऊत तसेच मोहिमेचे संयोजक ऋत्विक धनवट उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, ‘मुळा-मुठा नदी प्रवाहित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे.’
यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘नद्यांची स्वच्छता टिकवण्यासाठी केवळ सरकारी योजना पुरेशा नाहीत. लोकसहभाग आणि विशेषतः तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे.’
या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय संस्था तसेच शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला. आकुर्डी येथील अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘नदीला शब्दांची नाही, कृतीची गरज आहे’ आणि ‘नदी पुन्हा हसावी, यासाठी कारणीभूत बना’ अशा संदेशांद्वारे नदी संवर्धनाचा जागर करण्यात आला. या वेळी नदीकाठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. सहभागी नागरिकांनी प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. उपक्रमात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र आणि पांढरे टी-शर्ट देण्यात आले.
उपक्रमाचे प्रमुख ऋत्विक धनवट म्हणाले, ‘पुण्याच्या शाश्वत विकासासाठी नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि प्रदूषण नियंत्रण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुठा नदीचे संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग प्रेरणादायी आहे.’