
सुनयना सोनवणे / पुणे
पहाटेच्या धुक्यातून उमटणारा अभंगांचा स्वर, हातात टाळ, मुखी विठ्ठलनाम आणि डोळ्यांत समानतेचे स्वप्न… आषाढी वारीच्या या भक्तिमय प्रवासात यंदाही एक वेगळी वाट चालणारी दिंडी निघाली आहे. ही वाट केवळ पंढरीकडे जाणारी नाही, तर समाजात समता, बंधुता आणि मानवतेचा विचार रुजविणारी आहे. संतांच्या अभंगातील माणुसकीचा संदेश आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा धागा जोडणारी ‘संविधान समता दिंडी’ यंदा आठव्या वर्षात पदार्पण करत आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १०) पुण्यातील समताभूमी येथून या दिंडीचे प्रस्थान झाले. भक्तीच्या वाटेवरून सामाजिक जागृतीचा दीप घेऊन ही दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
औद्योगिक क्रीडा स्पर्धेत ‘टाटा मोटर्स’चा दबदबा! विजेतेपदावर कोरलं नाव, बजाज ऑटो उपविजेता
गेल्या सात वर्षांपासून ‘संविधान समता दिंडी’ संत परंपरा आणि संविधानातील मूल्यांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहे. आठव्या वर्षात प्रवेश करताना या दिंडीचा विस्तार राज्यभर झाला आहे. भक्ती संगम समूह, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध विभागांतील कार्यकर्ते योगदान देत आहेत.
कोकण विभागातून शरद कदम, नागेश जाधव, महादेव पाटील; पश्चिम महाराष्ट्रातून ॲड. वर्षा देशपांडे, दत्ता पाकिरे, नरेंद्र डुंबरे, विशाल विमल; उत्तर महाराष्ट्रातून राजाभाऊ अवसक, अविनाश पाटील, दीपक देवरे, सरस्वती शिंदे; मराठवाड्यातून शामसुंदर महाराज सोन्नर, भारत घोगरे गुरूजी, सुमित; तसेच विदर्भातून सुबोध दादा, डॉ. प्रकाश मानेकर, माया वाकोडे, रवि मानव आणि बबन कानकिरड हे या दिंडीच्या वाटचालीत सक्रिय योगदान देत आहेत.
संतांच्या अभंगांनी समाजातील भेदाभेद दूर करून मानवतेचा मार्ग दाखवला. वारकरी परंपरेतील हाच समतेचा विचार संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांशी जोडत ‘संविधान समता दिंडी’ समानतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे.
वारीतील भक्तिभावासोबत संविधानाच्या मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘संविधान समता दिंडी’त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, सामाजिक संवाद आणि जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत. वारकरी, युवक, महिला आणि विविध संस्था या माध्यमातून समतेचा विचार पुढे नेत आहेत.
पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक पावलासोबत भक्ती आणि माणुसकीचा विचारही पुढे सरकत आहे. ‘संविधान समता दिंडी’ ही याच विचाराची साक्ष आहे. विठ्ठलाच्या दर्शनासोबत समाजात समतेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करणारी ही दिंडी संतविचारांना आधुनिक काळातील संविधानिक मूल्यांची जोड देत आहे.
उत्रौली-वडगाव डाळ प्रकल्पाला पूर्णविराम, राज्य शासनाचा मोठा निर्णय; तरुणांची संधी हुकली