सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “पुण्यात आधीच वाहतूक कोंडीची बिकट समस्या असताना १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती दाखवत आहात?” असा थेट सवाल करत अमोल बालवडकर यांनी भाजपच्या या रॅलीला जिरोदार दर्शवला आहे. अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
“जगातील सर्वांत जास्त ट्रॅफिक असलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर ५ व्या क्रमांकावर आले आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ५० ते १०० दुचाकी आणण्यांचे टार्गेट देऊन हजारो गाड्या रस्त्यावर उतरवणे म्हणजे पुणेकरांचा बळी देण्यासारखे आहे.” “एकाच वेळी १५-२० हजार दुचाकी रस्त्यावर आल्यास शहरात मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होईल, तसेच इंधनाचा अपव्यय होईल. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी स्वतः इंधन बचतीचे आवाहन केले असताना भाजपचे स्थानिक नेते मात्र हजारो गाड्यांचा ताफा रस्त्यावर उतरवून प्रदूषण वाढवत आहेत. या रॅलीमुळे रुग्णवाहिका, रुग्ण, महिला आणि नोकरदार वर्ग वाहतूक कोंडीत अडकून पडेल.”
रॅलीऐवजी झाडे लावा, खड्डे बुजवा” केवळ वरिष्ठ नेत्यांना आणि वरिष्ठांच्या नजरेत आपली शक्ती दाखवण्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरू नका, असा सल्ला देत बालवडकर यांनी भाजपला पर्यायी उपक्रमांची सूचना केली. “जर खरच राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा करायची असेल, तर दुचाकी रॅलीऐवजी शहरात वृक्षारोपण करा, खड्डे बुजवा, रक्तदान शिबिरे किंवा स्वच्छता अभियान राबवा,” असे बालवडकर म्हणाले.
“नियोजनशून्य उपक्रम आणि रॅलीचा हट्ट बदलला नाही, तर आगामी काळात पुणेकर नागरिक स्वतःच्या पद्धतीने भाजपला या वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.” – अमोल बालवडकर नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुणे शहरात मंगळवारी (11 ऑगस्ट) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. अमोल बालवडकर यांनी या रॅलीला विरोध केल्यामुळे पुण्यातील राजकारण तापलं आहे.






