अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
पुणे : राज्यातील आकरावी प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. नियमित तीन आणि विशेष पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी मिळणार आहे. अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १३ लाख २६ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. व्यवस्थापन, संस्था अंतर्गत आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठीही स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षण संचालकांनी सांगितले.
अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक
– नोंदणी, अर्ज भरणे, दुरुस्ती व पसंतीक्रम १२ ऑगस्ट सकाळी १० ते १६ ऑगस्ट सायं. ६
– अलॉटमेंट प्रक्रिया १७ ऑगस्ट
– वाटप यादी प्रसिद्ध १८ ऑगस्ट सकाळी १०
– प्रवेश निश्चिती १८ ऑगस्ट सकाळी ११ ते २० ऑगस्ट सायं. ६





