
शिरूर तालुक्यात 5485 शिधापत्रिकांवरील धान्य बंद; सहाय्यक पुरवठा अधिकारी दीपक केदार यांची माहिती
कवठे येमाई : केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ अंतर्गत राज्यातील शिधापत्रिकांची तपासणी सुरू असून, राज्यभरातील सुमारे ६० हजारांच्या आसपास शिधापत्रिका वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळणे बंद झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिकासह शिरूर तालुक्यात ५४८५ शिधापत्रिकांवरील धान्य बंद झाले असल्याची माहिती शिरूर तालुका सहाय्यक पुरवठा निरीक्षण अधिकारी दीपक केदार यांनी दिली.
या कारवाईत पुणे जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिका वगळण्यात आल्या आहेत. शिधापत्रिका वगळण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वगळण्यात आलेल्या सर्वाधिक शिधापत्रिका कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. शासनाच्या तपासणीत अपात्र, दुबार, मृत तसेच स्थलांतरित लाभार्थ्यांच्या नावे असलेल्या शिधापत्रिकांचा शोध घेण्यात येत आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळावा आणि शासनाच्या धान्य वितरणातील गैरप्रकाराला आळा बसावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
दरम्यान, शिधापत्रिका वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पुरवठा कार्यालयामार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पात्रता सिद्ध करणाऱ्या लाभार्थ्यांना आवश्यक तपासणीनंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिका वगळण्यात आल्याने संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यात एकूण ५४८५ शिधापत्रीकांचे धान्य बंद करून सदर शिधापत्रिका पांढऱ्या म्हणजेच APL White करण्यात आल्या आहेत.
सदर ५४८५ शिधापत्रिकामध्ये उच्च उत्पन्न गट जसे कि मासिक पगार मिळणारे खाजगी कर्मचारी, IT रिटर्न भरणारे नागरिक, उद्यम पोर्टलवर व्यावसायिक रेजिस्ट्रेशन असलेल्या व्यक्ती, सोसायटी अथवा कंपनीच्या बॉडीवरील डायरेक्टर इ. लोकांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या मिशन सुधार ( Rightful Targeting of Beneficiaries) अंतर्गत हे कार्ड PHH व अंत्योदय योजनेतून वगळून APL white या योजनेत टाकली जात असल्याची माहिती देखील केदार यांनी दिली आहे.