
अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल...
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराला झोडपून काढणाऱ्या मुसळधार अतिवृष्टीमुळे थेरगाव, चिंचवडसह शहराच्या विविध भागांत भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अहोरात्र युद्धपातळीवर बचावकार्य राबवले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली असून, ५,००० हून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
२५ हून अधिक भागांना पुराचा वेढा
अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी आणि भोसरीतील कुंदननगर यांसह सुमारे २० ते २५ सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पूरग्रस्त भागांतून बाधित झालेल्या ५,००० नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. तेथे प्रशासनातर्फे भोजन, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत.
‘गुरुकुलम’मधील ३०० मुले आणि २०० गायींची सुरक्षित सुटका
चिंचवडगाव येथील पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मध्ये पुराचे पाणी वेगाने वाढल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनपा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी तातडीने यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने गुरुकुलममधील तब्बल ३०० विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवले.
केवळ मानवी जीवच नव्हे, तर मुक्या जनावरांच्या सुरक्षेसाठीही प्रशासनाने मोठे पाऊल उचलले. गुरुकुलच्या गोठ्यात पाणी शिरल्याने अडकलेल्या २०० हून अधिक गायींसह शहरातील एकूण ७५० जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या संवेदनशील कामगिरीबद्दल पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सभापती व प्रशासनाचे कौतुक केले.
‘या’ कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
महापालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांतील जनावानी परस्पर समन्वयाने ही मोहीम फत्ते केली. यामध्ये उप अग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने आणि जवान सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. तर नियंत्रण कक्षात २४ तास तैनात राहून पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी आपत्कालीन कॉल्सचे चोख व्यवस्थापन सांभाळले. सध्याही शहरात बचावकार्य अविरत सुरू आहे.