
अपूर्ण कामांमुळे प्रवासाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोकडून 'तारीख पे तारीख'
पिंपरी : पुणेकरांच्या, विशेषतः आयटी नगरीतील लाखो नोकरदारांच्या स्वप्नपूर्तीची घटिका समीप येण्याऐवजी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या ‘पुणे मेट्रो मार्ग३’ प्रकल्पाची प्रवासी सेवा १५ जूनपासून सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. प्रशासकीय स्तरावर १५ जूनची तारीख दिली जात असली, तरी जमिनीवरील सत्य परिस्थिती पाहता हा मुहूर्तही हुकण्याची चिन्हे आहेत.
या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’च्या (पीआयटीसीएमआरएल) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रकल्पाची आकडेवारी पाहिल्यास एक धक्कादायक वास्तव समोर येते. ८,३१३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मे अखेरपर्यंत ९७.४० टक्के खर्च झाला आहे; मात्र कामाची भौतिक प्रगती केवळ ९४.५८ टक्केच आहे. खर्च जवळपास पूर्ण होत आला असताना काम मात्र अद्याप ५ टक्क्यांहून अधिक शिल्लक असल्याने, हा निधी नेमका कुठे खर्च झाला आणि कामाला गती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
का रखडला ‘पुणे मेट्रो’चा रथ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विलंबामागे तीन मुख्य कारणे समोर येत आहेत
१. मजुरांची टंचाई : पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे या प्रकल्पावर काम करणारे अनेक मजूर आपल्या गावी परतले आहेत. यामुळे तांत्रिक कामांच्या गतीला मोठी खीळ बसली आहे.
२. अपूर्ण स्थानके : पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांपैकी अनेक ठिकाणी प्रवासी सुविधा, एस्केलेटर आणि सुशोभीकरणाची कामे अद्याप रेंगाळलेली आहेत.
३. प्रशासकीय संताप : पीआयटीसीएमआरएलकडून तांत्रिक पूर्ततेबाबत केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे स्वप्न अधांतरी
नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात हिंजवडी बाजूकडील १२ स्थानके सुरू होणार होती. यामध्ये मेगापोलिस सोसायटी, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज २, विप्रो, वाकड चौक आणि बालेवाडी स्टेडियम यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता जूनऐवजी आता थेट जुलैमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण २३.२०३ किमीची मार्गिका ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी सद्यस्थिती पाहता २०२७ उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“खर्चात वाढ झाल्यामुळे पेमेंट्सची टक्केवारी जास्त दिसत असली, तरी प्रत्यक्ष कामात मजुरांची टंचाई आणि तांत्रिक परवानग्यांसारखे काही अडथळे आले आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मेट्रो सुरक्षा आयुक्तांच्या (CMRS) तपासणीनंतर ही सेवा प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुली केली जाईल.” — रिनज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए
तारीख पे तारीख’: आश्वासनांचे इमले आणि विस्कळीत मुहूर्त!
हिंजवडी मेट्रोच्या मार्गावर कामापेक्षा डेडलाईन्सचाच पाऊस अधिक पडला आहे. गेल्या काही वर्षांत प्रशासनाने बदललेले हे काही प्रमुख मुहूर्त:
मार्च २०२३ : करारावेळचे पहिले स्वप्न; मात्र प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा होण्यासच तीन वर्षे उशीर झाला.
मार्च २०२५ : कामाला सुरुवात झाल्यावर दिलेली ‘अधिकृत’ डेडलाईन; मात्र नियोजनाचा अभाव नडला.
एप्रिल २०२६ : ९४ टक्के काम झाल्याचा डांगोरा पिटला, पण प्रवासी सेवा सुरू होऊ शकली नाही.
३१ मे २०२६ : प्रशासनाने दिलेला ‘नवा मुहूर्त’; स्थानकांवरील अपूर्ण कामांमुळे तोही हवेत विरला.
१५ जून २०२६ : आताचा ताजा ‘वायदा’; पण जमिनीवरील वास्तव पाहता हा मुहूर्तही हुकणार हे स्पष्ट आहे.
विलंबाचे मुख्य कारणे
१. सुरुवातीचा विलंब : २०१८ मध्ये पायाभरणी होऊनही प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली (अंदाजे ३ वर्षांचा विलंब).
२. भूसंपादन : विशेषतः शिवाजीनगर आणि काही मोक्याच्या ठिकाणच्या जागेचा ताबा मिळण्यास झालेला उशीर.
३. तात्पुरते अडथळे : कोव्हिड-१९ चा काळ आणि अलीकडे पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे झालेली मजुरांची टंचाई.
सद्यस्थिती : ८,३१३ कोटींच्या या प्रकल्पात पैसा खर्च झाला असला (९७.४०%), तरी कामाची प्रत्यक्ष प्रगती (९४.५८%) अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे १५ जूनचा मुहूर्तही केवळ ‘कागदावरच’ राहण्याची शक्यता अधिक आहे.
हे सुद्धा वाचा : विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान, हल्लेखारांवर कठोर कारवाई करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी